कुडाळ : कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या १९८९-९०च्या कॉमर्सच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २७ वर्षांनी एकत्र आले. फक्त एकत्र जमून मौजमजा न करता पन्नाशीकडे झुकलेल्या सर्वांनीच एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी कायमस्वरूपी एक निधी उभारण्याचा निश्चय या सर्वांनी केला.
कॉलेजमधून बाहेर पडल्यावर ‘ती सध्या काय करते’ किंवा ‘तो सध्या काय करतो’ असे प्रश्न त्या सर्वांच्या मनात होते. फक्त ते व्यक्त होत नव्हते. असेच काही मित्र एकत्र आले आणि या बॅचचा एक स्नेहमेळावा करायचे ठरले. एकमेकांचा शोध सुरू झाला. व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला. संजू नाईक, अरुण आरेकर, राजा पावसकर, दत्ता बोभाटे, कविता खोचरे, संगीता शिरसाट या सर्वांनी संपूर्ण बॅचला एकत्र आणायचा चंगच बांधला. दोन महिने ही सगळी प्रक्रिया सुरू होती आणि स्नेहमेळाव्यासाठी २१ मे हा दिवस ठरला.
सगळे सकाळीच कुडाळच्या एस. आर. एम. कॉलेजमध्ये जमा झाले. कॉलेजचे कर्मचारी भांडारकर, संतोष वालावलकर आणि जाधव यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला. कॉलेजसमोर एक ग्रुप फोटो झाला. ज्या मैदानाशी निगडित काही छान आठवणी होत्या त्या मैदानावर सर्वांनी फेरफटका मारला. तिथेही ग्रुप फोटो काढल्यानंतर सारे जण पिंगुळीच्या ‘ड्रीमलँड गार्डन’ला रवाना झाले. काही जण अगदी गुजरात, कर्नाटक, गोव्यामधूनही आले होते.
नाश्ता वगैरे झाल्यावर एकमेकांचा परिचय सुरू झाला. संजीवनी पाताडे साताऱ्याहून आपल्या पूर्ण कुटुंबासह आल्या होत्या. त्यांची कन्या ऐश्वर्या हिच्या गणेशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिचय ऐकण्यात साऱ्यांनाच खूप रस होता. प्रत्येक जण कसा ‘सेटल’ झालाय, ते, त्यांची मुले काय करतात, याची माहिती जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा होती. कॉलेजमधल्या समस्या वेगळ्या होत्या आणि संसाराला लागल्यावरच्या समस्या वेगळ्या. या समस्या टाळून शांत जीवन जगण्यासाठी संतोष कोठावळे यांनी सर्वांकडून मेडिटेशन करून घेतले.
त्यानंतर एकमेकांशी बोलताबोलता कधीच जेवणाची वेळ झाली. अर्थात त्या वेळीसुद्धा गप्पा संपत नव्हत्या. बोलण्यासारखे खूप होते. सुख-दु:खे शेअर करावीशी वाटत होती. मने मोकळी होत होती. जेवणानंतर पुन्हा गप्पा, महेश ओटवणेकर, संजीवनी पाताडे, तिची कन्या ऐश्वर्या यांची गाणी, सुनील प्रभू, दत्ता बोभाटे आणि बंड्या जोशी यांचा ‘दशावतार’ या कार्यक्रमांनी खूपच रंगत आणली. सुनील प्रभूंनी तर साऱ्यांनाच खूप हसवले. मग निरोपाचा क्षण जवळ आल्यावर सारे जणच काहीसे भावविश झाले. प्रफुल्ल पारकर, वासंती नागदे, आनंद गावडे, कविता खोचरे अशा काही जाणांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात मैत्रीचा ओलावा जाणवत होता.
पन्नाशीकडे झुकलेली ही सारी मित्र-मंडळी. आताच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावांबरोबरच अनेक आजारसुद्धा सोबत असलेले. मोठे आजार असले, की त्यावरचे उपायसुद्धा खर्चिक. साऱ्यांनाच परवडतील असे नाही. त्यासाठी सर्वांनी एक निधी उभारायचा आणि कोणी कोणत्या आर्थिक अडचणीत असेल तर त्याला जमेल तशी मदत करायची, असा निश्चय साऱ्यांनी केला. दर वर्षी सर्वांनी एकत्र यायचे असेही ठरले आणि तशा आशयाच्या गुरव यांनी घातलेल्या गाऱ्हाण्याने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
अनेक वर्षांनंतर शालेय किवा महाविद्यालयीन मित्रमैत्रिणी एकत्र येतात. मौज-मजा करतात; पण त्याच वेळी एकमेकांच्या आरोग्याची आणि जीवनातल्या अडचणींची जाणीव ठेवून त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच खरी मैत्री जपणे असे म्हणावे लागेल.